प्रशासनाकडून पारंपरिक पायघड्या
सोलापूर प्रतिनिधी : आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, आज श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने धाराशिव जिल्हा हद्दीतून तामलवाडीच्या पुढे उळे-कासेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याच्या वेशीवर पालखी दाखल होताच, सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने व अत्यंत भक्तीमय वातावरणात या भक्तीगंगेचे जंगी स्वागत करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर झालेल्या या भव्य स्वागत सोहळ्याला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जातीने उपस्थित राहून माऊलींचे दर्शन घेतले अक्कलकोट मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, भाजप प्रवक्ते बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य खंडागळे भाऊ उत्तर सोलापूर भाजप तालुका अध्यक्ष संभाजी दडे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अत्यंत भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे मानाच्या दहा पालख्यांसह शेकडो दिंड्या येत असतात. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावहून निघालेली ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सहभागी वारकरी ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ असा अखंड जयघोष करत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तन करत आनंदाने पुढे मार्गस्थ होत होते. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करूनही अबालवृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा नसून केवळ पंढरीच्या दिशेने चालण्याचा आनंद आणि विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत होती.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. हा पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आज श्री गजानन महाराजांची पालखी उळे येथे मुक्काम करणार असून, उद्या ही भक्तीगंगा सोलापूर शहरात प्रवेश करेल. प्रशासनाच्या या चोख नियोजनामुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.









