सोलापूर विद्यापीठात विशेष व्याख्यान व शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम
सोलापूर – स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय पराक्रम, विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते. त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्य रक्षणाच्या संघर्षमय जीवनातून आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संभाजीनगर येथील व्याख्याते डॉ. बालाजी जाधव यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्रा’च्या वतीने संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. अनिल घनवट, रमेश चौंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व स्वागत करताना अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड यांनी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे संशोधन आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविण्याचा अध्यासन केंद्राचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या व्याख्यानात डॉ. जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक पैलूंवर प्रकाश टाकला. औरंगजेबाच्या अत्याचारांविरोधात त्यांनी दिलेला लढा. स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान, तसेच त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची उदाहरणे त्यांनी प्रभावीपणे मांडली. संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर संस्कृत, हिंदी, फारसीसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले विद्वान राजे होते, असे सांगत त्यांनी ‘बुधभूषण’ या ग्रंथाचाही उल्लेख केला. राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि संकटातही न डगमगणारे नेतृत्व हे संभाजी महाराजांच्या जीवनातून शिकण्यासारखे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यातून राष्ट्रभक्ती, त्याग आणि धैर्याची शिकवण मिळते, असे ते म्हणाले.
व्याख्यानानंतर सांगली येथील प्रसिद्ध शाहीर अविष्कार देशिंगे यांच्या शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित पोवाड्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभक्ती आणि शिवकालीन इतिहासाच्या गर्जनांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला.
या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ. नेताजी कोकाटे, डॉ. विकास शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. आभार डॉ. अनिल घनवट यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान व शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. बालाजी जाधव, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. अनिल घनवट व अन्य.












