पोर्ट लुईस येथे 7 व 8 मे रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी डॉ महावीर शास्त्री व डॉ माधुरी शास्त्री यांना विशेष व्याख्यानासाठी आमंत्रण प्राप्त झाले आहे. आर्य सभा पेम्पलमाउसेस या मॉरिशसच्या राजधानीतील संस्थेद्वारे या परिषदेचे आयोजन केले गेले आहे. विविध देशातील प्रतिनिधींना यामध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एप्रिल महिन्यात 9व्या हिंदसागर परिषदेसाठी उपस्थिती दर्शवली. या भेटीतील चर्चेनुसार शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेनंतरच सर्वधर्म संमेलन होणार असून यातही डॉ महावीर शास्त्री हे जैन समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशसच्या समाज शास्त्र विभागातर्फे भारतीय उपखंडातील भाषांचा मॉरिशसच्या जीवनावर प्रभाव या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आर्य सभेतर्फे ब्राम्ही लिपीचे शिबिर आयोजित करण्यात आले असून डॉ. माधुरी शास्त्री यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. भारत सरकारच्या सहयोगाने होत असलेल्या या परिषदेचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल अध्यक्ष डॉ वि. सितालो यांनी पत्राद्वारे विशेष हर्ष व्यक्त केला आहे. या दहा दिवसीय भेटी दरम्यानच ‘जितो मॉरिशस’ यांनीही शांतीसभा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

