सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची ऊसदरासंदर्भातील महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी येत्या 30 नोव्हेंबर रोजी एफआरपीसह अधिकचा दर जाहीर करण्याचे कारखानदारांनी आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळप सुरू होऊन 20 दिवस उलटूनही अद्याप ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. जे कारखानदार अनुपस्थित होते, त्यांची बैठक सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी संघटनांकडून केंद्र शासनाच्या एफआरपी दरानुसार आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करूनच ऊसदर जाहीर करण्याची मागणी होत आहे.
बैठकीस युटोपियन शुगर्स, अवताडे शुगर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, श्री संत दामाजी, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (युनिट 1 व 2), श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर, धाराशिव शुगर सांगोला, वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी, मोहिते-पाटील सहकारी कारखाना अकलूज, श्री संत कुर्मदास कारखाना पडसाळी, सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर, इंद्रेश्वर शुगर, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज, लोकमंगल शुगर इथेनॉल, राजीव अॅग्रो पॉवर आदी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

