मुंबई : अजित पवार गटासोबत असणारा बेचाळीसावे आमदार कोण? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ते बेचाळीसावे आमदार म्हणजे, नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान, अजित पवार गटाकडून असा दावा करण्यात आला आहे. तसेच, नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
राष्ट्रवादी कोणाची? हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर गेला असून यावर सुनावणी सुरू आहे. काल (शुक्रवार) पासून सुरू असलेल्या या सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं 42 आमदार आपल्या बाजूनं असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला होता.