वल्याळ, गोप यांचा शेकडो समर्थकांसह बीआरएस मध्ये प्रवेश
हैदराबाद : सोलापूर सारखे मोठे शहर विकासापासून वंचित आहे, येथे शिकलेल्या मुलांना रोजगारासाठी परगावी जावे लागते. हे विदारक चित्र दूर करण्यासाठी बीआरएसच्या हाती सत्ता द्या. आम्ही शहराचा विकास तर करूच शिवाय मोठे मोठे आयटी कंपन्याही आणू, असे आश्वासन बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शनिवारी हैदराबाद येथे दिले.
हैदराबाद येथील भारत राष्ट्र समितीच्या मुख्यालयात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप,भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह संतोष भोसले,जुगून अंबेवाले आणि राजश्री चव्हाण या भाजपच्या माजी नगरसेवकांनी केसीआर यांच्या प्रमुख उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला,याप्रसंगी केसीआर बोलत होते. ते पुढे म्हणाले की,स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही देशाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे,लोकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला जनतेने संधी दिली, तरीदेखील या राज्याचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अशीच परिस्थिती देशाच्या अन्य राज्यांची आहे. तेंव्हा भारतात क्रांती,परिवर्तनाची गरज आहे,परिवर्तित भारतच समस्यांचे उच्चाटन करू शकतो. बीआरएस हा क्रांती आणणारा पक्ष आहे. बीआरएस पक्षाचा देशभरात विस्तार करून शेतकऱ्यांची सत्ता देशावर आणण्याचा आमचा संकल्प आहे.असे केसीआर म्हणाले.
या कार्यक्रमात केसीआर यांच्या भाषणापूर्वी नागेश वल्याळ यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,सोलापूरचा आजवर सत्ताधाऱ्यांनी विकास केला नाही. त्यामुळे आता तेलंगणा पॅटर्नची सोलापूरला नितांत गरज आहे. सोलापूरचा विकास करण्याच्या उद्देशाने मी व गोप यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. उच्च शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई,बेंगळुरू, हैदराबादला जातात. त्यांच्यासाठी सोलापूरात आयटी कंपनी आणणे बीआरएसकडून अपेक्षित आहे.