मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून निश्चित झाले आहे. गौरी भिडे यांनी या संदर्भात ८ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. त्याच सोबत उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप आरोप केला. गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडे यांनी नव्या खंडपीठापुढे धाव घेतली आहे.