सोलापूर ” जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हरित वसुंधरा फाउंडेशनच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी येथे १३५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे कार्बनचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी पर्यावरणास उपयुक्त अशा वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आवश्यक आहे. याचे महत्त्व ओळखून हरित वसुंधरा फाउंडेशन च्या वतीने आज पर्यंत शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे.
या वर्षीच्या वृक्षारोपणाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी परिसरात देशी प्रजातीची १३५ झाडे लावून करण्यात आली. करंज, कडुलिंब, पिंपळ, वड, आंबा, सीताफळ, आपटा या प्रजातींचा यामध्ये समावेश होता. मागच्या दोन वर्षात फाउंडेशन च्या वतीने या ठिकाणी २८६ रोपे लावली होती त्यापैकी कंपनी ने २६७ रोपे व्यवस्थितरीत्या जोपासली आहेत.
चेट्टीनाड सिमेंट कंपनीचे प्लान्टहेड श्रीनिवासा बाबू बी. आर यांनी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले तसेच फक्त कंपनीतच नव्हे तर तुम्ही राहता तिथे ही पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याबाबतचे कामगारांना आवाहन केले. फाऊंडेशनचे गीता कसुलवार, लीना कसुलवार, रोहन खंदारे, दीपक गायधनकर, गौरव जक्कल, प्रशांत गाजुल, सागर संभारम, प्रतीक भडकुंबे, उमाकांत गजेली, गौरव जक्कल, यशराज पाटील, नवल कर्ली आणि अमित बनसोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपक्रमाचे समन्वयक शंकर सोलापुरे आणि कंपनी मधील कामगार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.