वचनरक्षक कक्कय्या पुस्तकाचे कक्केरीत उत्साहात प्रकाशन
सोलापूर- बाराव्या शतकातील ज्येष्ठ वचनकार आणि महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील कल्याणक्रांतीनंतर वचन रक्षणासाठी बलिदान देणारे शरण डोहर कक्कय्या यांच्या चरित्राचा सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन कक्कय्यांचे समाधीस्थळ कक्केरी (ता. खानापूर) येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगुरुदेव आश्रमच्या परमपूज्य गुरूमाता नंदाताई या होत्या. बसवपीठावर ज्येष्ठ साहित्यिक ना.म.शिंदे यांच्यासह कक्कय्या मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ हे श्रेष्ठशरण डोहर कक्कय्यांच्या चरित्राची सर्वंकष मांडणी करणारे मराठीतील पहिलाच प्रयोग आहे. कक्कय्यांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन घेण्यात आलेल्या समकालीन संदर्भातील नोंदी या पुस्तकाचे बलस्थान असल्याचे गौरवोदगार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. सोलापूरच्या सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रगती प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या लेखन प्रपंचामुळे लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे या दोघांचे सुशीलकुमार शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.
तत्पूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी शरण कक्कय्या यांची महापूजा केली. शिंदे यांची कक्कय्या मंदिरास पहिलीच भेट असल्याने समाजबांधवांच्या उत्साहाला उधाण आले होते.
या प्रसंगी सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे, प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे, संतोष पवार, सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष राजश्री सोनकवडे, कुमार कक्कय्या पोळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिदानंद पोळ, उपाध्यक्ष गौतम पोळ, श्रीकांत पोळ, मनोहर नारायणकर, शांताराम शिंदे, राम गोपाळ चौगुले, नागनाथ व्हटकर, सुधाकर सोनकवडे, प्रा.डॉ.राजेंद्र सोनकवडे यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.