अविनाश व्ही. कुलकर्णी
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील युनियन जॅक खाली उतरवून भाई छनूसिंह चंदे ले यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव घाडगे उपस्थित होते. 15 ऑगस्ट 1947 व सोलापूर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे . 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झाला परंतु त्याआधी म्हणजेच 9 , 10 व 11 मे 1930 रोजी तीन दिवस सोलापूर ने स्वातंत्र्य उपभोगले होते. या तीन दिवसात सोलापूर शहराचे नियंत्रण कर्मवीर रामकृष्ण जाजू , देशभक्त तुळशीदास जाधव आदी काँग्रेस नेत्यांनी केले होते. यामुळेच सोलापुरातील जनतेवर दहशत बसवून परिस्थिती ताब्यात आणण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लष्करी कायदा, मार्शल लॉ सोलापुरात लागू करून अत्याचाराची परिसीमा घातली होती. या लढयात मल्लप्पा धनशेट्टी , कुर्बान हुसेन , जगनाथ शिंदे , श्रीकिसन सारडा यांना फाशीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले1942 चा चले जाव चा अखेरचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर यशाची मोहोर लावून संपला. स्वातंत्र्याचा सूर्य उगवणार हा आशेचा किरण या लढ्याने दाखवला या लढ्यात सोलापूरच्या अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकांना छळवाद सहन करावा लागला होता. पण अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य सूर्याच्या दर्शनाने नागरिकांनी मोठया उत्साहात , आनंदात स्वातंत्र्य दिन सोलापूरकरनी साजरा केला…. गिरण्याचे भोंगे , इंजिनाच्या शिट्ट्या , औटगोळ्यांच्या सलामीच्या वंदेमातरम चा मंत्रनाद सोलापुरात घुमला होता. 14 ऑगस्ट 1947 हा दिवस मावळला रात्री 12 वाजून 2 मिनीट झाल्यानंतर शहरातील सर्व कापड गिरण्याचे भोंगे वाजू लागले. सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या इंजिनाच्या शिट्ट्या वाजू लागल्या फटाक्यांच्या पेटत्या माळांनी आसमंत दणाणून गेला. रोषणाईने लख लखणाऱ्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ध्वज बुरुजावर ऐटदार तिरंगा फडकू लागला.. 21 औटगोळ्यांच्या सलामीत सोलापुरात वंदेमातरम चा मंत्र नाद घुमला सारे वातावरण भारावून सोडणार तो चैतन्यदायी ऐतिहासिक अविस्मरणीय क्षण ठरला चौक चौकात , घराघरांवर , शाळांवर तिरंगा जल्लोषात फडकवण्यात आला होता जुनी गिरणीवर विद्युत दिव्यानी तिरंगा झलकवण्यात आला होता . भागवत चित्रपटगृह , जुनी गिरणी , नगरपालिका , टिळक चौक , इंद्रभुवन आदी ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा दीपोत्सव पाण्यासाठी नागरिकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते . टिळक चौकात मध्यरात्रीनंतर शहर काँग्रेसचे अध्यक्ष केशवलाल शहा यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी नगराध्यक्ष लोणकरजी चंडक , रामकृष्ण जाजू , तुळशीदास जाधव , डॉ कृ. भी. अंत्रोळीकर ,छन्नूसिंग चंदेले , वि. गु. शिवदारे आदी उपस्थित होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी पार्क मैदानावर मामा चितळे यांच्या हस्ते झेंडावंदनाच कार्यक्रम पोलीस सलामी ने पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संभाजीराव घाडगे , भाई चंदेले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले ..दुपारी पार्क मैदानावरून तिरंग्याने , फुलांनी , आकर्षक सजावटीने गांधी , नेहरू , पटेल व मौलाना आझाद यांच्या प्रतिमा असलेल्या मोटारी , बैलगाड्या आदींची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या शेवटी असलेल्या माल मोटारीवर भारत मातेची प्रतिमा होती. या प्रतिमेच्या एका बाजूला हुतात्मापुत्र शंकरप्पा धनशेट्टी व दुसऱ्या बाजूला सिद्रामप्पा फुलारी तलवार घेऊन उभे होते. मिरवणुकीत लाठ्या काठ्यांची व लेझीमची आकर्षक पथके होती. ही मिरवणूक प्रमुख मार्गावरून सुभाष चौकात विसर्जित झाली. सायंकाळी पार्क मैदानावर सभा झाली. मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वरधापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
सोलापूरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर दिवाळी साजरी केली होती .. 15 ऑगस्ट 1947 व सोलापूर
- अविनाश व्ही. कुलकर्णी