मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवारपासूनच केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई शनिवारी रात्री थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. राजेश डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते? सगळा भाजप त्यांच्या वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत, ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवाब मलिक बोलताना म्हणाले की, ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. त्यांनी माहिती दिली की, माझ्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, मला परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो, अशी माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती.”
“देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर पोलीस त्यासंदर्भातील चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? रेमडेसिवीरचा साठा स्वतः कडे घेण्यासाठी आणि साठा सरकायला देऊ नका अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे. राजेश डोकानीया यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे. तसेच त्यांना पुन्हा गरज भासल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.”, असं नवाब मलिक म्हणाले.