येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान लसीकरणासाठी केंद्रांवर होणाऱ्या गर्दीवरुन त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आलं आहे. यामुळे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
“अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. आपल्याकडे अत्यंत अल्प साठा आहे. १ लाख ७६ हजार लस येत असल्याचं मला माध्यमांकडून कळालं आहे. पण तेदेखील अपुरं पडणार आहे. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांचीच इतकी मोठी रांग आहे. बीकेसीमध्ये केंद्राबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. रुग्ण वाढत असताना लस घेऊन सुरक्षित राहावं अशी लोकांची भावना आहे. गर्दीचं रुपांतर मोठं होतं असून त्यात लस घेण्यासाठी आलेले कोणी बाधित तर होत नाही ना अशी भीती आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.