मुंबई : चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान बाळगणेही गरजेचे असते, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
ते मंगळवारी नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीतील 118 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस उप निरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून तुम्ही सुदृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.