येस न्युज मराठी नेटवर्क : भारतात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. पाच महिन्यांनंतर, सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन करोनबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३७ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक करोनामुक्त झाले आहेत.
करोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ५० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ४८ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण ३ लाख ६९ हजार रुग्ण सध्या उपचाराधिन आहेत.