येस न्युज मराठी नेटवर्क : हिंसा केल्याने कोणत्याही समस्याचे निराकरण होऊ शकत नाही. कोणत्याही कारणांशिवाय शस्त्र हाती घेणाऱ्या लोकांसोबत चर्चा करून शांततेने तोडगा काढला जाऊ शकतो, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून दिला.
‘परीक्षा पे चर्चा’ द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन ‘मन की बात’ केली. विद्यार्थ्यांनो लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. देशाच्या तरुणांचा आत्मविश्वास वाढला आहे. एकीकडे परीक्षा सुरू होणार आहेत तर दुसरीकडे थंडी पसरलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा असा मोलाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. सध्या फिट इंडियासाठी खूप प्रयत्न होताना दिसत आहेत. फिट इंडिया स्कूल मोहिमेला जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. ६५ हजार शाळांनी अर्ज करून प्रमाणपत्र मिळवल्याची माहितीही मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षीच्या पहिला कार्यक्रम आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, प्रजासत्ताक दिनामुळे आपल्याला मन की बात कार्यक्रमाची वेळ बदलावी लागली. दिवस बदलतात. वेळ बदलते, वर्ष बदलते, परंतु, भारतीय लोकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी आम्ही अनेक संकल्प केले. सिंगल यूज प्लास्टिक, मुली शिकवा, मुली वाचवा अभियान राबवले. जल संरक्षणासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. यात प्रत्येक समाजातील व्यक्तींनी योगदान दिले. उत्तराखंडच्या इल्मोडा मध्ये एक किलोमीटर पर्यंत पाइप लाइन टाकून दोन दशकापूर्वीची समस्या मिटवण्यात आली. देशभरात अशा असंख्य कथा आहेत. जल संरक्षण केले जाणारे कार्य शेअर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.