सोलापूर – चालू वर्षात एल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील शेतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाचे उशिरा आगमन, पावसातील खंड, तसेच एकूण पर्जन्यमानात घट यामुळे खरीप हंगामातील पेरणी उशिरा होण्याची किंवा पुन्हा पेरणी (पुनर्लागवड) करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोलापूर जिल्ह्यात “जलतारा शेतखड्डा प्रात्यक्षिक” हा प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे व भूजल पातळी वाढवणे हा आहे.
तसेच चिबड युक्त जमिनीमध्ये जलताराचे काम केल्यास पाण्याचा निचरा होऊन जमिन चिबडयुक्त होण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याकरीता जलतारा हा अत्यंत महत्वपुर्ण व परिणामकारक उपाय आहे.
पावसाळ्यात शेतातून वाहून जाणारे पाणी योग्य ठिकाणी अडवण्यासाठी शेतात साधारण 5×5 फूट रुंद व 6 फूट खोल शोषखड्डे तयार करून त्यामध्ये दगड, खडी व वाळू भरून नैसर्गिक फिल्टर तयार केला जातो. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूजल पुनर्भरणास मोठी मदत होते. तसेच चिबडयुक्त जमिनीत पाण्याचा निचरा सुधारतो. परिणामी विहिरी, बोअरवेल व पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम पुढीलप्रमाणे आढळून आले आहेत:
- भूजल पातळीत सुमारे 14 फूटपर्यंत वाढ
- पिकांच्या उत्पादनात सुमारे 42 टक्क्यांनी वाढ
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुमारे 120 टक्क्यांनी वाढ
- पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत सुधारणा
तसेच दिनांक 1 मे ते 4 मे 2026 या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज पेटी ठेवण्याच्या सुचना सर्व तालुका कृषि अधिकारी यांनी देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ग्रामपंचायत स्तरावर अर्ज पेटी उपलब्ध नसल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृ्षि अधिकारी यांना कळवावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

