कवी सौमित्र यांना दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार प्रदान
सोलापूर- दि. २४- कविवर्य दत्ता हलसगीकर यांची कविता निखळ, नितळ, सात्विक आणि सकारात्मक होती. त्यांनी आपल्या कवितांमधून माणुसकीचे पसायदान मागितले. आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रक्षेपणातून त्यांच्या कविता २२ भाषांमध्ये प्रसारित झाल्या. त्यांच्या कवितेमुळे मराठी साहित्याला असामान्य उंची प्राप्त झाली, असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले.




महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा ज्येष्ठ कवी स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार नामवंत कवी व अभिनेते किशोर कदम यांना सोमवारी सुनील शिनखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा होत्या.
रोख दहा हजार रुपये, चांदीचे कमळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री हिरचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.शिनखेडे म्हणाले, दत्ता हलसगीकर हे सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे कवी होते. उज्जल ६० वर्षे त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या कवितेत गरिबांचे चांदणे होते; मात्र दुःखाविषयी त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट प्रेम आणि करूणा हेच त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय होते.
पुरस्कारप्राप्त कवी किशोर कदम यांच्या काव्यप्रतिभेचेही शिनखेडे यांनी कौतुक केले. सौमित्र यांच्या कवितांमध्ये जगण्यातील संघर्ष दिसून येतो. त्यांच्या अनेक कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घातली आहे. पाऊस आणि कवी सौमित्र यांचे नाते त्यांच्या अनेक कवितांमधून घट्टपणे जाणवते, असे त्यांनी सांगितले.
किशोर कदम यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या कविता साध्या-सोप्या भाषेत सामान्य माणसांच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. हलसगीकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्या आजवरच्या काव्य प्रवासाला मिळालेली पावती आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुहासिनी शहा यांनी कवी सौमित्र यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला. मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात हलसगीकरांच्या साहित्यिक योगदानाचा आणि साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. तर कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले.
. यावेळी कल्याण शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर, रामचंद्र धर्मशाळे, अविनाश कामतकर, अश्विनी वाघमोडे आणि संदीप कुलकर्णी यांचा कवी सौमित्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी वाघमोडे यांनी केले, तर यशवंत बिराजदार यांनी आभार मानले.या समारंभाला अशोक हलसगीकर, वसुधा हलसगीकर, प्रदीप हलसगीकर, रवी हलसगीकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर, मोहन दाते, डॉ. नसीम पठाण, डॉ. रवींद्र पाठक, डॉ. किरण पाठक, श्रीकांत कुलकर्णी, प्रशांत जोशी, अचला राचर्ला, डॉ. माधुरी भोसले, संतोष पवार, रोहिणी कुलकर्णी,सचिन चौधरी, गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
. सासुरवाडीचा सन्मान
कवी सौमित्र हे सोलापूरचे जावई आहेत, आपल्या भाषणात त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, दत्ता हलसगीकर यांच्या नावाचा पुरस्कार मला माझ्या सासुरवाडीत मिळतोय याचा मला विशेष आनंद झाला आहे. अकरा वर्षांपूर्वी प्रिसिजनने माझा गौरव केला होता, इथे माझ्या नात्यातील अनेक मित्र आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मी स्वीकारला आहे. यापूर्वी मला अनेक पुरस्कार मिळाले; परंतु सोलापूरच्या या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे, अशा शब्दांत त्यांनी सोलापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही कविता सादर केल्या.











