सोलापूर शहरात कुंभार वेस परिसरात जय भवानी प्रशाला मैदान आणि त्या परिसरात महापालिकेच्या असलेल्या तीन शाळा दुर्दैवी म्हणावे लागतील. अक्षरशः कचऱ्याच्या आणि घाणीच्या गर्दीत या शाळा सापडल्या आहेत. या ठिकाणी जय भवानी प्रशाला, मनपा मुलांची शाळा क्रमांक 29, आणि कन्नड अशा तीन शाळांची मिळून 250 मुले शिक्षण घेतात. इतकी दुरावस्था पाहिल्यानंतर सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी किती बधिर आहेत याची जाणीव होते.
शाळेला गेट नाही, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अवैध धंदे चालतात. वर्गांना खिडक्या नाही, दरवाजे नाहीत. विद्यार्थ्यांना बसायच्या बेंच तुटलेले आहेत. स्लॅपचे प्लास्टर अनेक ठिकाणी पडले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मुला मुलींना स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. परिसरात जिकडे पहावे तिकडे कचराच कचरा आणि दुर्गंधी. वर्गातील फरश्या खालीवर झाल्या आहेत.भिंती तुटल्या आहेत.अनेक भिंतीमध्ये झाडे उगवली आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटने या शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ही शाळा धोकादायक जाहीर केली, तरीही याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही.
येस न्यूज मराठीने याबाबत रिपोर्ट केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा थोडी जागी झाली. प्रशासनाधिकारी मल्हारी माने हे आज कार्यालयीन वेळ असताना देखील गावी गेलेत. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे सुट्टीवर असल्यामुळे ते हे या शाळेत गेले नाही. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात ही शाळा आहे. महापौर विनायक कोंड्याल आणि स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांना त्यांच्या बिझी शेड्युलमधून दुपारपर्यंत शाळेला व्हिजिट द्यायला वेळ मिळाला नाही.
आजवर या शाळेने दोन डझन पत्रे झोन अधिकारी क्रमांक दोन, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रशासनाधिकारी तसेच आयुक्तांना दिली आहेत. मात्र त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान या माध्यमातून कोठ्यावधी रुपये शाळा परिसर विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आले हा पैसा नेमका हा संशोधनाचा विषय आहे. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर पडल्यानंतर 13 मुले जखमी झाल्यावर राज्यभर हे प्रकरण गाजले. मात्र सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना या जय भवानी शाळेबद्दल थोडीदेखील आस्था वाटत नाही हे दुर्दैव. उद्या कदाचित मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर आयुक्तांनीच द्यावे.










