सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना डावलून अनेक ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. इतर पक्षातून आलेल्या 62 उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी या दोन्ही आमदाराकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. निष्ठावंतांना डावलले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी घेतली होती. त्यामुळे बंडखोरांना बळ आले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. बाळे ते जुळे सोलापूर अशा सर्वच प्रभागात बंडखोरांनी आपले झेंडे उंचावले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी अटळ आहे. जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्लॅननुसार शहरात सर्व तिकिटे वाटप केली असून यावर पहिल्यापासूनच दोन्ही आमदार नाराज आहेत. प्रभाग क्रमांक एक ते दहा पर्यंत तसेच प्रभाग क्रमांक 19 ते 26 पर्यंत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. दोन्ही आमदारांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला असून दुपारी तीन नंतर भूमिका जाहीर करणार असे सांगितले आहे त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार आणि भाजपमध्ये किती बंडखोर उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतात, हे आज तीन वाजल्यानंतर कळणार आहे.

