मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. केरळ सोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षणातील पॅटर्न मधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.
महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिंदे फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची टीम देशातील अशा राज्यात गेली जिथे शिक्षणात नवीन प्रयोग केले जाताय. ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती झाली आहे त्या राज्यातील पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामध्ये केरळ पॅटर्नवर विशेष काम केलं जाईल. सोबतच राजस्थान आणि पंजाब मधील मॉडेलचा देखील विचार यामध्ये केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
कोरोनानंतर महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा या तीन-चार राज्यांच्या तुलनेत खालवलेला आहे, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. सोबतच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय असल्यामुळे विद्यार्थी गांभीर्याने परीक्षेला सामोरे जात नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा पॅटर्न राबवल्यानंतर शिक्षणासोबत कला, विज्ञान विषयाच्या गुणवत्तेत वाढ होईल असा विश्वास शिक्षण विभागाला आहे.
राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी केल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नात केरळ पॅटर्न त्यासोबतच पंजाब आणि राजस्थान मॉडेल एकत्र आणून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं जाईल. मात्र अशा प्रकारचे पॅटर्न राबवताना त्याचा कितपत फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होतो? हा पॅटर्न राज्यात कसा राबविला जातो? की फक्त कागदावरच राहतो हे येणाऱ्या काळात कळलेच.