गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो मान्सून आला आहे. राज्यात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून आला होता, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे आता शेतकरी बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे.
राज्यात कोकणात पाऊस सुरु झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत होता. पुढचे दोन दिवस चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला होता. किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किलोमिटरने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसाच्या सरी होत होत्या. परंतु आता मान्सून दाखल झाला आहे. ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.
पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विट करत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनचे 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटक, तामीळनाडू अन् आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे.