राज्यातील शेकडो शाळांच्या संच मान्यतेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.या त्रुटी 15 जानेवारीपर्यंत दूर न केल्यास संबंधित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाईल असा इशारा शिक्षण विभागाने शाळांना दिला आहे.शिक्षण विभागाकडून 15 मार्च 2024 नुसार सुधारित संच मान्यता निकष लागू केले आहेत. तसेच 21 फेब्रुवारी व 26 मार्च 2025 च्या शासनपत्रानुसार सन 2025 – 26 साठीची संच मान्यता माहिती शिक्षणाधिकारी लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळांनी माहितीची तपासणी करून योग्य संच मान्यतेवर डिजिटल स्वाक्षरी करून ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.यापूर्वीच संच मान्यतेसंदर्भात कोकणातील शिक्षकांनी 15 मार्च 2024 च्या नवीन संच मान्यता निकषांना आव्हान देत याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले.
20 नोव्हेंबर 2025 कालावधीत संच मान्यतेची माहिती तात्काळ पूर्ण भरण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. राज्यातील सर्व शाळांच्या संच मान्यता संदर्भात 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरलेली माहिती अंतिम म्हणून ग्राह्य धरली जाईल असे देखील शिक्षण संचालक श्रीराम पानझडे यांनी निर्देशात नमूद केले होते. आता पुन्हा नव्याने सूचना देत प्रक्रिया अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता संच मान्यता अंतिम टप्प्यात असून 15 जानेवारीपर्यंत त्रुटी न भरलेल्या शाळांचे वेतन रोखले जाईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

