नवी दिल्ली: देशभरात सुरू असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. गेल्या 100 वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत आहे. या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो. आपली एका अदृश्य शक्तीसोबत लढाई सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 8 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी देशवासियांशी संपर्क साधला असता कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली. कोविड रुग्णांचं दु:ख, वेदना मी समजू शकतो. आपली लढाई एका अदृश्य शक्तीसोबत आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. नागरिकांना जे दु:ख झालं. जे दु:ख अनेकांनी अनुभवलं आहे, मी ते दु:ख समजू शकतो, असं मोदी म्हणाले.
100 वर्षानंतर ही महामारी आली आहे. ही महामारी पावलोपावली जगाची परीक्षा घेत आहे. या काळात आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. गेल्या काही काळात देशावासियांनी जे भोगलं आहे. या संकटाच्या काळातही काही लोक स्वार्थासाठी औषधे आणि आवश्यक वस्तुंचा काळाबाजार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन मी राज्य सरकारांना करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
भारत हिंमत हरणारा देश नाही. कोणताही नागरिक हिंमत हरणार नाही. आपण लढू आणि जिंकू. देशभरातील रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जात आहे. तुम्हीही लस टोचून घ्या. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस संरक्षण कवच म्हणून काम करेल. गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण करेल. मास्क आणि सुरक्षित अंतर हे विसरून चालणार नाही, असंही ते म्हणाले.
