मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा दिली..
मध्य रेल्वेत १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. १.१०.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील ऐतिहासिक महाव्यवस्थापक इमारतीमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा देऊन मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा -2025 ची सुरुवात केली.
एस. के. सागर, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याची वचनबद्धता व्यक्त करून दरवर्षी १०० तास म्हणजेच आठवड्यातून २ तास स्वच्छतेसाठी स्वेच्छेने कार्य करण्याची, लोकांमध्ये जनजागृती करण्याची तसेच स्वच्छतेचा संकल्प स्वतःपासून, कुटुंबापासून, परिसरापासून, गावापासून व कार्यस्थळापासून सुरू करण्याची प्रतिज्ञा घेतली.
प्रतिज्ञेपूर्वी दिलेल्या थोडक्यातल्या भाषणात अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी पद्धतीने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.
स्वच्छता पंधरवडा -२०२५ हा १७.९.२०२५ पासून देशभर सुरू झालेल्या “स्वच्छता ही सेवा-२०२५” या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा पुढचा टप्पा आहे. मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या या पंधरवड्याच्या स्वच्छता अभियानात स्थानके, गाड्या, कार्यशाळा, डेपो, रेल्वे रुग्णालये, रेल्वे कार्यालये, रेल्वे वसाहती तसेच रेल्वेशी संबंधित प्रत्येक घटक यांची सखोल स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून हे अभियान रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडले जाईल.

