सोलापूर : कॉंग्रेसच्या सरकारने जेवढे कर्जमाफीसाठी पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकार दर वर्षी शेतकर्यांना अनुदान स्वरूपात देत आहे. मात्र श्रेयासाठी काम करण्याची आमची पद्धत नाही. आज या बंधार्याचे भूमिपूजन झाले, लवकरच याचे उद्घाटनही सर्वांना पहायला मिळेल, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. तिर्हे येथील बॅरेज बंधार्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. सुभाष देशमुख थापाड्या आहे, बंधारा कधी होणारच नाही, झाला तर त्यात पाणी येणार नाही असा प्रचार विरोधकांनी चालू केल्यामुळेच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा लागला, असेही आ. देशमुख म्हणाले .
सोलापूर -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तिर्हे येथे होणार्या सीना नदीवरील पुलाचे रूपांतर बॅरेज बंधार्यात करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार होते. आ. देशमुख पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गडकरी यांचे काम चोख असते. त्यांनी एकदा मनावर घेतले की ते काम झालेच म्हणून समजा. या बॅरेजचा फायदा उत्तर व दक्षिणसह मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांना होणार आहे. या कार्यक्रमाला शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत बंडगर, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, माजी सरपंच भारत जाधव, राम जाधव, विशाल जाधव, सुनील गुंड, संजय शिंदे, शशिकांत पवार, सूरज मणेरी, विजय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृष्णा – भीमा स्थिरीकरणाशिवाय पर्याय नाहीः आ. रणजितसिंह
तिर्हे येथील बॅरेज बंधार्यामुळे परिसरातील शेतकर्यांना फायदा होणार आहे. मात्र जिल्ह्याच्या कायमच्या पाणीप्रश्नावर कृष्णा-भिमा स्थिरिकरण ही योजनाच उत्तर आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या या संकल्पनेला राजकारणातून विरोध होत आहे .मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व इतर भाजपच्या नेत्यांनी या योजनेसाठी अनुकूल प्रतिसाद दिला आहे .त्यामुळे येणार्या भविष्यात ही योजना प्रत्यक्षात येण्याची आशा आहे, अशी अपेक्षा आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.













