सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज, सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून तपासात अडथळा निर्माण करू शकतात. त्याशिवाय या प्रकरणाशी संबंधितांवरही दबाव निर्माण करतील. त्यांना जामीन देताना ज्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. त्याचे पालन त्यांच्याकडून होत नसल्याचेही सरकारी वकिलांनी म्हटले. आव्हाड यांच्या वकिलांनी सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देताना सांगितले की, ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खूप गर्दी होती. त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असती. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आव्हाड प्रयत्न करत होते.