नवी दिल्ली : रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने, “वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे धमकावले जात असेल तर सर्वसामान्यांच्या मदतीला कोण धावून येईल?” असा सवाल उपस्थित केला.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने डॉक्टरांवरील हल्ले गंभीर असल्याचे स्पष्ट करत अशा आरोपींना जामीन देण्याबाबत कठोर भूमिका व्यक्त केली. या प्रकरणात आरोपीचा जामीन रद्द करण्याबाबतही न्यायालयाने संकेत दिले असून पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.









