अपुऱ्या पावसाचा ऊस पिकाला मोठा फटका; पाणीटंचाईच्या भीतीने शेतकरी ऊस चाऱ्यासाठी देऊ लागले..
सोलापूर जिल्हा ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. उजनी धरणाचे पाणी, सिंचनाच्या उपलब्ध सुविधा आणि तुलनेने हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढले आहे. जिल्ह्यात आजवर तब्बल ४२ साखर कारखाने उभारले गेले आहेत.मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात सुमारे २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली होती. त्यापैकी ३५ साखर कारखान्यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत सुमारे १ कोटी ५७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ८.८७ टक्के साखर उताऱ्याने सुमारे १ कोटी ३९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे.पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अनेक शेतकरी उभा ऊस जनावरांसाठी चारा म्हणून वापरत असल्याचे चित्र जिल्ह्यातील काही भागांत पाहायला मिळत आहे. विशेषतः कोरडवाहू आणि अपुऱ्या सिंचनाच्या भागातील ऊस पिकाला याचा मोठा फटका बसत आहे.
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही यंदा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नदीकाठच्या काही भागांतील ऊस पाण्याअभावी करपून गेला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे वाचलेला काही ऊसही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.सध्या उजनी धरणाच्या पाण्यावर आधारित सिंचनामुळे काही भागांतील ऊस पीक तग धरून आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी पावसाची स्थिती याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम आहे.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. पुढील काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर यंदाच्या ऊस उत्पादनात निम्म्याहून अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर होऊ शकतो.उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर घटल्यास अनेक साखर कारखान्यांना अपेक्षित क्षमतेने गाळप करणे कठीण होऊ शकते. काही कारखान्यांसमोर गाळप हंगाम कमी कालावधीचा ठेवण्याची, तर काही ठिकाणी ऊसअभावी कारखाने बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदाचा पावसाळा हा केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण साखर उद्योगासाठी निर्णायक ठरणार आहे.











