सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबर रेशीम उत्पादनाकडे वळाल्यास हा उत्तम शेती पूरक व्यवसाय ठरेल, त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो असे मत श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी हिरज येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालय, नागपूर व श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिरज येथे रेशीम कोष या नियंत्रित शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ सभापती दिलीप माने यांच्या हस्ते आज करण्यात आला. अध्यक्षस्थानी पुणे येथील रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड होते.
यावेळी बोलताना विठ्ठल फड यांनी रेशीम उत्पादन आणि रेशीम उद्योगाचे महत्त्व विशद केले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या उद्योगाला चालना देण्यासाठी सभापती दिलीप माने यांनी घेतलेला पुढाकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. लिलावात रेशीम कोष किमान ६४० रु. तर कमाल ७८० रु. आणि सर्वसाधारण दर ७६५ रु. प्रति किलो शेतकऱ्यांना मिळाला. लिलावात २०१ किलो रेशीम विक्रीसाठी होते. एका दिवसात १ लाख ५३ हजार ८०३ रुपयांची उलाढाल झाली.
या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक नागना बनसोडे, प्रथमेश पाटील, केदार विभुते, गफ्फार चांदा यांच्यासह बाजारपेठेतील केदार उंबरजे, श्रीशैल अंबारे, रेवणसिद्ध आवजे, महानिंगगप्पा परमशेट्टी, रेशीम उत्पादक शेतकरी बालाजी पवार (धाराशिव), निवृत्ती माळी (बाभळगाव, पंढरपूर), बापू गायकवाड, असलम मुलानी (रिधोरे, माढा), राहुल सुडके (गौर, कळंब), रेशीम खरेदीदार राकेश माहेश्वरी (सांगली), मोहन गायकवाड (बारामती), अभिजीत घाडगे (रुक्मिणी दत्त सिल्क कोल्हापूर), परमेश्वर कोरे (मुरुड), रेशीम संचालनालयाचे अधिकारी संदीप आगवणे(नगर), शिवानंद जोजन (बीड), शरद बावणे ( लातूर), महादेव गावंडे ( सोलापूर), सोलापूरचे रेशीम अधिकारी विनीत पवार, बाजार समितीचे सचिव अतुलसिंग रजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.











