अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केली माळशिरस तालुक्यातील EOC ची पाहणी
सोलापूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर (EOC) तातडीने सज्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेचे इन्सिडेंट कमांडर म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी काम पाहत आहेत.
माळशिरस तालुक्यातील EOC ची प्रत्यक्ष पाहणी
अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी यांनी मंगळवारी माळशिरस तालुक्यातील सर्व EOC ची स्वतः भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सर्व EOC इन-चार्ज यांना आपापल्या केंद्राला भेट देऊन आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मुख्याधिकारी अभिजीत पाटील, माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.
डेप्युटी इन्सिडेंट कमांडर यांना अहवाल देण्याचे आदेश
पाहणीअंती सर्व EOC इन-चार्ज यांनी केलेल्या कार्यवाहीचा अद्ययावत अहवाल आज डेप्युटी इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी (SDO) यांना सादर करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी दिले. EOC साठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यास SDO यांच्याकडून आदेश घेऊन मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंडप व दळणवळण व्यवस्थेबाबत सूचना
मंडप आणि इतर आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी सर्व EOC इन-चार्ज यांनी संबंधित गटविकास अधिकारी (BDO) तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सतत संपर्कात राहून कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
BSNL फोन कार्यान्वित
माळशिरस तालुक्यातील सर्व EOC साठी BSNL फोन तहसीलदार माळशिरस यांच्याकडे कार्यान्वित करून देण्यात आले असून ते संबंधितांनी तात्काळ ताब्यात घ्यावेत. इतर तालुक्यांतील EOC साठी BSNL फोन आज दुपारपर्यंत कार्यान्वित करून वितरित करण्यात येणार आहेत.
आषाढी वारी कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व EOC २४ तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकरी-भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले आहे.








