आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या होटगी रोडवरील आसरा चौक रेल्वे उड्डाणपूल (ROB) दुपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासोबतही चर्चा करून सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

होटगी रोड आणि जुळे सोलापूर परिसराला जोडणारा आसरा चौक उड्डाणपूल हा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या पुलाच्या दुपदरीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचा मोठा अडथळा निर्माण झाला.
ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च कोण उचलणार यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनात एकमत होत नसल्याने प्रकल्प रखडला होता. परिणामी कामाची मुदत संपूनही उड्डाणपुलाचे काम पुढे सरकले नव्हते.
या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी रेल्वे, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार जलवाहिनी न हलवता उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय निश्चित करण्यात आला.
याच अनुषंगाने झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आता या महत्त्वाच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











