राजीव श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी जून २०२६ महिन्यासाठी मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि रेल्वेच्या सुरक्षित परीचालनासाठी केलेल्या समयसूचक कार्यवाहीबद्दल ‘संरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि समर्पण वृत्ती यांच्या कौतुकार्थ हे संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले; यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास आणि प्रवासी व रेल्वे परीचालनाची संरक्षा सुनिश्चित करण्यास मदत झाली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट संरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे.
पुरस्कार विजेत्यांचा तपशील
मुंबई विभाग (६ पुरस्कार विजेते)
(१) मिलिंद खंडागळे, लोको पायलट, लोणावळा (मुंबई विभाग): दिनांक २६.०२.२०२६ रोजी मालगाडीवर कर्तव्यावर असताना, ठाकूरवाडी – कर्जत विभागातून जात असताना त्यांना मालगाडीचे युटीएसएस-सीसीआयके ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अत्यंत जबाबदारीने परिस्थिती हाताळली आणि मोठ्या सावधगिरीने व प्रयत्नांनी गाडी थांबवली. त्यांची परिपक्वता, अनुभव आणि सतर्कता यामुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(२) दशरथ सिंग, ट्रेन मॅनेजर, पनवेल (मुंबई विभाग): दिनांक २६.०२.२०२६ रोजी मालगाडीवर कर्तव्यावर असताना, ठाकूरवाडी – कर्जत विभागातून जात असताना त्यांना मालगाडीचे युटीएसएस-सीसीआयके ब्रेक निकामी झाल्याचे समजले. त्यांनी अत्यंत जबाबदारीने परिस्थिती हाताळली आणि एअर प्रेशर कमी करून गाडी थांबवण्यात लोको पायलटला मदत केली. त्यांची परिपक्वता, अनुभव आणि सतर्कता यामुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(३) गौरव कुमार, रेल्वे उपव्यवस्थापक, कर्जत (मुंबई विभाग): दिनांक २६.०२.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना त्यांना माहिती मिळाली की एका मालगाडीचे युटीएसएस-सीसीआयके ब्रेक निकामी झाले आहेत आणि ती गाडी कर्जतच्या दिशेने येत आहे. त्यांनी गाडीला पुढे जाण्यासाठी कर्जत यार्डऐवजी मुख्य मार्गाचे सिग्नल त्वरित मोकळे केले. त्यांच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(4) हरिकृष्ण रेरे, मास्टर क्राफ्ट्समन (C&W), लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई विभाग, दिनांक २०.०४.२०२६ रोजी गाडी क्रमांक 11061 च्या देखभालीदरम्यान एका डब्याच्या ‘सीबीसी नकल’ मध्ये तडा असल्याचे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना सूचित केले आणि वेळेवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(5) नितेश कुमार यादव, इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर (S&T विभाग), कळवा, मुंबई विभाग, दिनांक ०१.०६.२०२६ रोजी कळवा स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांना ‘अप धीम्या मार्गावर रुळाला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(6)संतोष जी. जाधव, इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर (S&T विभाग), दादर, मुंबई विभाग, दिनांक ०३.०६.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना त्यांना ‘पॉइंट मशीन’मधील ‘नॉर्मल लॉक स्लाईड’ला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
पुणे विभाग (२ पुरस्कार विजेते)
(7) एस. के. मंडल, लोको पायलट शंटर, मिरज, पुणे विभाग, दिनांक ०४.०६.२०२६ रोजी शंटिंगच्या कर्तव्यावर होते. मिरज यार्डच्या मुख्य मार्गावर ‘पॉवर ब्लॉक’ असतानाही ‘शंटिंग नेक’ विभागासाठी सिग्नल देण्यात आला होता. श्री मंडल यांनी गाडी पुढे नेली असता त्यांना शिडीच्या साहाय्याने काम करणारे ओएचई कर्मचारी दिसले. त्यांनी त्वरित लोको इंजिन थांबवले आणि संबंधित सर्वांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.
(8) डी. टी. कोकले, हेड कॉन्स्टेबल, आरपीएफ, सातारा, पुणे विभाग, दिनांक १३.०५.२०२६ रोजी सातारा येथे कर्तव्यावर होते. जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे सातारा स्थानकाबाहेर उभारलेला राष्ट्रध्वजाचा खांब धोकादायकपणे डगमगत होता; संभाव्य धोक्याची जाणीव होताच, श्री कोकले यांनी प्रवाशांना सावध केले आणि तेथील वाहने हटवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य गंभीर अपघात टळला.
भुसावळ विभाग (२ पुरस्कारप्राप्त)
(९) रवींद्र गणवीर, तंत्रज्ञ, भुसावळ यार्ड, भुसावळ विभाग, दिनांक ०३.०५.२०२६ रोजी नियमित देखभाल तपासणीचे काम करत असताना, त्यांना ‘बीओएक्सएनएचएल’ प्रकारच्या वॅगनचे ग्रीस सील सैल असल्याचे दिसून आले. ही त्रुटी वेळीच दुरुस्त न केल्यास अपघात होऊ शकला असता. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली आणि वेळेवर कार्यवाही करण्यात आली, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
(१०) बळीराम शंकर चौधरी, गेटमन, बडनेरा, भुसावळ विभाग, दिनांक १५.०५.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना, त्यांना तेथून जाणाऱ्या एका मालगाडीच्या चाकाचा अक्ष अतिगरम (Hot Axle) झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित लाल सिग्नल दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी न थांबल्यामुळे, त्यांनी पुढील गेटमनला गाडी थांबवण्यासाठी सतर्क केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
नागपूर विभाग (१ पुरस्कारप्राप्त)
सुरेश चंद मीना नागपूर विभागातील हिंगणघाट येथील स्टेशन व्यवस्थापक यांनी दिनांक २३.०५.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना, स्थानकावर आलेल्या एका मालगाडीच्या वॅगनच्या मागील ट्रॉलीच्या डाव्या बाजूच्या ‘ईएम पॅड’मधून ज्वाळा बाहेर पडताना पाहिल्या. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली आणि आग विझवली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
महाव्यवस्थापकांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या आदर्श निष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे इतर रेल्वे कर्मचारीही प्रवाशांची संरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याबाबत सतर्क व कटिबद्ध राहण्यास प्रेरित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद, इतर विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











