गेल्या वर्षी मुसळधार पाऊस पडला असताना आणि उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे जवळपास अडीशे टीएमसी पाणी हे भीमा नदीतून वाहून गेले असताना यंदाच्या वर्षी पुन्हा टंचाईच्या झळा जिल्ह्याला निर्माण होऊ लागली आहेत. जानेवारीअखेरपर्यंत उजनी धरण हे शंभर टक्के भरले होते. अवघ्या चारच महिन्यात 121 टीएमसी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा निम्मा कमी होऊन तो आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार 55 टीएमसी एवढा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी धरणाची पाणी पातळी मायनस 23 टक्के होती. यंदाच्या वर्षी देखील ही पाणी पातळी आता त्या दिशेने वाटचाल करत असून आजच्या आकडेवारीनुसार मायनस पातळी साडे पंधरा टक्के इतक्या खाली पोहोचली आहे. सध्या 2100 क्युसेक ने धरणातून कॅनल द्वारे शेतीसाठी पाणी पाणी सोडले जात असून होणारी बाष्पीभवन यामुळे दररोज दोन टक्के एवढा पाणीसाठा कमी होत आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व काही ठीक होईल मात्र अल निनो चा अडथळा निर्माण झाल्यास मात्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.










