सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडात ऐकून नागरिक भयभीत झाले होते. वादळी वाऱ्यासह या अवकाळी पावसाने सोलापूर शहर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. द्राक्ष आंबा केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्वारी कांदा हरभरा गहू याचे देखील या अवकाळी मुळे नुकसान झाले आहे. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. कुठे झाडे पडली तर कुठे झाडाच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर पडल्या आहेत. रात्री साडेबारा ते दोन च्या दरम्यान हे वादळी वारे आणि पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब तसेच काही भागात रात्री गारांचा पाऊस पडला. विजांचा एवढा मोठा आवाज होता की जणू भूकंप झाल्याचा भास होत होता. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून चार ते पाच अंशाने तापमान कमी झाले आहे.
