सोलापूर : शहरातील वसंत विहार परिसरातील बालाजी पॅराडाईज बिल्डींग येथील रहिवाशांनी यावर्षी होळी उत्सव केवळ पारंपरिक पद्धतीने न साजरा करता सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमाद्वारे साजरा केला. “दहन करू या निराशेचे” आणि “दहन करू या नकारात्मकतेचे” अशा आशयाचे फलक लावून समाजातील व मनातील वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन करण्याचा सुंदर व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे होळीच्या निमित्ताने केवळ लाकूड जाळण्याऐवजी मनातील कटुता, मत्सर, द्वेष, नैराश्य, अहंकार, वाईट सवयी आणि नकारात्मक विचार यांचे दहन करून सकारात्मकता, एकोप्याची भावना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे हा होता.
रहिवाशांनी एकत्र येत पर्यावरणपूरक पद्धतीने होळीची उभारणी केली. फलकांद्वारे समाजाला संदेश देण्यात आला की, “वाईट प्रवृत्तींचे दहन करा आणि चांगुलपणाचे स्वागत करा.” या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.
बालाजी पॅराडाईजमधील नागरिकांनी सांगितले की, सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्यासाठी नसून समाजाला योग्य दिशा देण्याचे माध्यम देखील आहेत. या उपक्रमामुळे लहान मुलांमध्येही चांगल्या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.
हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, इतरांनीही अशा प्रकारे सामाजिक संदेश देणारे सण साजरे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

