
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीची पुढील दिशा ठरवली जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईत भाजपकडून नवाब मलिक यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवाब मलिक भाजपसोबत नको, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वबळावर तयारी करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जर मुंबईत महायुतीत सामील न होण्याचा निर्णय झाला, तर त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू महानगरपालिका निवडणुका ठरत असून, त्यातूनच सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागावाटप, नेतृत्व आणि स्थानिक समीकरणांवरून मतभेद उफाळून येत आहेत. महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट असलं, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मात्र साशंकता निर्माण करणारी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात लढण्याची घोषणा केल्यानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेमकी कोणती रणनीती असणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांबाबत अजित पवारांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. या दोन्ही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची तयारी असल्याचं त्यांनी सूचक विधान केलं आहे. स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि भाजपविरोधात प्रभावी लढत उभारण्यासाठी हा पर्याय विचाराधीन असल्याचं मानलं जात आहे. मात्र, त्याच वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिकाही अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवार गटाशी संवादाची शक्यता, तर दुसरीकडे स्वबळाचा निर्धार, अशा दुहेरी रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राजकीय डाव अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे. यामुळे महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडणार का, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित झाला आहे.
कोकाटे प्रकरणात राष्ट्रवादीवर दबाव वाढवला जाण्याची शक्यता
दरम्यान, माणिकराव कोकाटे प्रकरणावरही अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. आमचा माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोर्टात पुढे काय घडतं, यावर सगळं अवलंबून आहे. त्यानंतरच कोकाटेंबाबत काय निर्णय घ्यायचा, ते ठरवू, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. कोकाटे यांच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर नैतिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पक्षातही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर कोणताही घाईघाईचा निर्णय न घेता कायदेशीर प्रक्रियेचा अभ्यास करूनच पुढील पाऊल उचललं जाईल, असा संकेत अजित पवारांच्या वक्तव्यातून मिळतो. मात्र, विरोधकांकडून या प्रकरणावरून राष्ट्रवादीवर दबाव वाढवला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मुलगी आमदार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाशी चर्चा करायची, ते आम्ही ठरवू, असे सांगत भाजपच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले. तसेच, महायुतीत चांगले लोक येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असं विधान करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर सूचक टिप्पणी केली. एकंदर पाहता, मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महायुतीत राहायचं की स्वतंत्र लढायचं, या निर्णयावरच आगामी महानगरपालिका निवडणुकांतील राजकीय समीकरणं ठरणार असून, राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत.
