राज मुळे महाआघाडीत ठिणगी
यस न्यूज चॅनलचा आढावा
(राजकीय अंक भाग एक)
यस न्यूज चॅनलच्या सुजाण दर्शकांनो, सध्याची महाराष्ट्रातील राजकीय अस्थिर परिस्थिती कोणत्या थराला व कोणत्या दिशेने जात आहे हे दाखवून देण्यासाठी हे विशेष राजकीय वार्तापत्र आम्ही घेऊन आलो आहोत. हे या राजकीय अंकाचा पहिला भाग आहे.
सत्तासुंदरीला वश करण्याच्या नादात महायुतीतील घटक पक्ष भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या प्रमुख शिलेदारांनी एकमेकांविरुद्ध वाग्बाण सोडत निवडणुकीच्या रणधुमाळीत धुराळा उडवून दिला आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत मतभेद माजले असून महाआघाडीची बिघाडी होण्यास सुरुवात झाली आहे.
खरे तर राज्यात गुवाहाटी नाट्याच्या दुसऱ्या अंकात भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत दादांच्या राष्ट्रवादीला देखील सत्तेवर बसवले.
तीन चाकांची ही रिक्षा विकासाच्या नावाच्या बुलेट ट्रेन बनवून धावत असल्याचे चित्र बुलेट ट्रेन चालक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केले आहे.
या बुलेट ट्रेनचे चालक देवेंद्र फडणवीस असले तरी पाठीमागच्या गार्डच्या डब्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार असून यांच्या हातामध्ये बुलेट ट्रेन रोखण्याचा लाल भावटा आहे हे विसरता कामा नये. सुरूवातीला या तिघांमध्ये कमालीचा समन्वय असल्याने विकासाची ही बुलेट ट्रेन विना अडथळा धावत असल्याचे पाहायला मिळाले.
परंतु, आता राज्यांमध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असतानाच हे चालक आणि हे गार्ड सत्ता मिळवण्याच्या नादात जाहीर सभांमधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
प्रमुख नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये उभी फट निर्माण झाली असून येत्या वर्षाखेरीस प्रमाणे या महासत्तेचा देखील अखेर होतोय की काय अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे.

नगरपरिषदा जिंकायच्या नादात राज्यात आपल्या महायुतीचे सरकार आहे यांचा विसरच जणू या नेत्यांना पडला असून राज्यातील सत्ता अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.
विशेष म्हणजे महायुतीतील या खिंडारीला सोलापुरातून सुरुवात झाली आहे.
अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषदेच्या सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकतेच शिंदेसेनेत आलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांचा जाहीर सभेत पाणउतारा केला. कल्याणशेट्टींच्या या शाब्दिक बाणाने घायाळ झालेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रत्युत्तरात एवढ्या कमी कालावधीमध्ये कल्याणशेट्टी यांनी एवढी माया कशी काय कमवली असा सवाल करत भाजपा हा पक्ष ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या तत्त्वाविरोधातच चालत असल्याचे मतदारांच्या, नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. या दोघांमधील या वादांच्या ठिणगीने महायुतीत पेट घेतला आहे.

अन्य एका जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी वापरलेले अहंकार आणि रावणाची लंका हे शब्द भाजपासाठीच असल्याची चर्चा सुरू होती. ही चर्चा खरे मानत देवेंद्र फडणवीस यांनी रावणाची लंका जाळणारे आम्हीच आहोत असा पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपल्या या जहरी टीकास्त्राचा स्पष्टीकरण देताना ‘अहंकार फार दिवस टिकत नाही. रावणाची लंका ही जळून गेली,’ हे शब्द भाजपासाठी नव्हे तर ठाकरेंसाठी आहेत असे सांगत आपल्या वाग्बानाची दिशाच बदलून टाकली.

आणि अशातच देवाभाऊंशी दुरावा निर्माण झाल्यानेच एकनाथ शिंदे सतत दिल्ली वारी करत आहेत, अशी आवई उठवत देवेंद्र आणि एकनाथ मध्ये आणखी दुरावा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांंनी केला.फडणवीस यांनी मात्र विरोधकांचा हा दावा फेटाळत आमच्यातील दुरावा हा माध्यमांनी निर्माण केलेला आहे, असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
भाजपा – शिंदेसेनेमध्ये हा कलगीतुरा रंगत असतानाच अजितदादा तरी मागे कसे राहतील? यापूर्वीच आपल्या बेधडक वाग्बाणाची प्रचिती त्यांनी राज्याला दाखवून दिलीच होती. राजकारणाच्या या रणधुमाळीत त्यांनी देखील धुमाकूळ घालत राज्याची तिजोरी माझ्याकडेच आहे. जर तुम्ही मतात कट मारला तर मी निधीत कट मारेन, अशी धमकी देत मतदारांवर पकड जमवण्याचा प्रयत्न केला.

याला प्रत्युत्तर देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे चिलखत परिधान करत राजकीय रणांगणावर सामोरे आले. ‘राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारालाच मते द्या असे जे कोणी म्हणत असले तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही. परवानगी शिवाय तिजोरी उघडली तर काय म्हणतात ते सगळ्यांना माहीत आहे,’ असा भीमटोला लगावला. इतकेच बोलून गप्प बसतील तर पाटील ते कसले ! ‘सर्वांनी महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करावा. वेगळे लढायचे असेल तर एकमेकांवर टीका करू नये,’ असे ठरले असल्याचे सांगत येत्या पाच सहा दिवसात त्यांनी नियम मोडला तर मी ही बघत बसणारा नाही, असा खणखणीत इशारा दिला.

एकनाथ शिंदेने देखील अजित पवारांचा कित्ता गिरवत नाशिक मध्ये ‘मी नगर विकास मंत्री आहे. त्यामुळे कोणीही कितीही आवाज केला तरी माझाच आवाज चालेल.’ असा इशारा देत अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
आपल्याच वक्तव्याने आपणच घायाळ होत असल्याचे लक्षात येताच अजितदादांनी दिलगिरी व्यक्त करत, ‘राज्याचा अर्थमंत्री या नात्याने निधी देणे माझ्या हातात आहे, मात्र असे काही वक्तव्य केले, की मीडिया त्याचा बाऊ करत असल्याने आता मी निधीबाबत वक्तव्य करताना सुधारणा करेन,’ असे सांगितले. पण त्यासोबतच ‘अजित पवार मागील 35 वर्षाच्या राजकारणामध्ये असून कोणाच्याही एक रुपयांचा शर्मिंदा नाही,’ असे सांगत राज्याच्या राजकारणातील आपल्या शब्दाला किती वजन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
हे घडत असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोन चिरंजीव एकमेकांविरोधात समोर ऊभे ठाकले. मालवण मध्ये शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन घडवूून आणत एका भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी पैसे सापडल्याचा व्हिडिओ सर्वत्र जाणीवपूर्वक व्हायरल केला. या विरोधात नितेश राणे यांनी आपल्याच भावाच्या या कृत्याचा खरपूस समाचार घेत ‘आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? असा खडा सवाल करत राजकीय चष्म्यातून प्रत्येक गोष्टीकडे पाहू नये. आमच्या पक्षाची कुणी बदनामी करू नये, असा इशारा देत राजकारणातील हा वाद कौटुंबिक पातळीवर आल्याचे दाखवून दिले.

महायुतीतील या वाक् युद्धाचा क्लायमॅक्स भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 27 नोव्हेंबरला घडवूनआणला. जळगावातील भडगाव येथे पत्रकारांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘येत्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे.’ असे ब्रम्हास्त्र टाकून महाराष्ट्राच्या राज्यात राजकीय खळबळ उडवून देत राजकीय भूकंप होत भयंकर व अकल्पित उलथापालथ होणार असल्याची आकाशवाणीच केली जणू महायुतीतील ही ठिणगी ज्या सोलापूर जिल्ह्यात पडली होती, त्याच सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीतील एका प्रचार सभेत या पहिल्या अंकातील शेवटचा प्रवेश देखील घडून आला.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गट आणि शिंदेसेना यांची कुर्डूवाडी नगरपरिषदेत झालेली निवडणूक पूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते, असे वक्तव्य करत ‘लढणारी माणसे कधीच शरणागती पत्करत नसतात. कुर्डूवाडीमध्ये यानिमित्ताने लोक आज एकत्र आलेत, हे कदाचित भविष्याची राजकारणाची नांदी ठरेल.’ असे सूचक वक्तव्य करत शिंदेसेना आणि शरद पवार एकत्र येण्याचे संभाव्य सुतोवाच केले.
महायुतीतील या नाटयांमध्ये हे सर्व घडत असतानाच महाआघाडीतील बिघाडी देखील चव्हाट्यावर आली आहे.
राज ठाकरे यांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेसने असहमती दर्शवली असून काँग्रेसच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीतील या अंतर्गत धुसफुशीचा आणि संघर्षाचा फायदा उचलण्याचे सोडून महाआघाडीतील पक्ष आपल्या बेभरवशाच्या पक्षांना एकत्र गुंतवून ठेवण्यासाठी निरर्थक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीत काँग्रेस हा आपणच सर्वात मोठा पक्ष आहे असे वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असले, तरी शरद पवार गटातील धुरंदर पैलवान षढ्ढू ठोकत आपणच आघाडीवर आहोत हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्वात जास्त गोची झाली ती उद्धव ठाकरे यांची! मुंबई हातातून जाऊ न देण्यासाठी राज ठाकरेंसोबत त्यांनी मनोमिलन घडवून आणले. पण येथे काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा मनसुबा उधळून लावत ताकत नसतानाही स्वबळावर लढण्याचा इशारा दिला.


या दोन बंधूंची हिंदुत्वा विषयी बदललेली भूमिका आणि परप्रांतीय लोकांविषयी असलेला दृष्टिकोन पाहता काँग्रेसने या दोघांपासूून दूर राहणेच पसंत केले आहे.
दर्शकहो,
एस न्यूज चॅनलच्या सुजाण दर्शकांसाठी राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थितीचा आढावा आम्ही या वार्तापत्रामध्ये घेतला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हे राजकीय धुरंदर कोणकोणते वाग्बाण आपल्या भात्यातून सोडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आणि ते आपणांसमोर आणून राज्यातील राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, हे आपल्याला दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तूर्तास इतकेच

