सोलापूर : सज्जनांच्या संपर्काशिवाय सज्जनता येत नाही, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी सोमवारी साई मार्केटने आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा समारोप प्रसंगी केले . कृष्ण- अर्जुन संबंध कळल्याशिवाय भगवंतांनी सर्व गुज अर्जुनास का सांगितले हे कळत नाही असे सांगून स्वामीजी म्हणाले की, संपूर्ण गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाचे अर्जुनपण संपून गेले गेले आणि तो कृष्णासमोर उभा ठाकला.
गीता वाचणे, शिकविणे आणि ऐकणे याचेही फळ भगवंतांनी सांगितले आहे असे स्वामीजींनी स्पष्ट केले. सर्व वेदांचे सार महाभारतात आहे , महाभारताचे सार भगवद्गीतेत आहे आणि भगवद्गीतेचे सार ज्ञानेश्वरीत असल्याचे स्वामीजींनी स्पष्ट केले. खरे अध्यात्म शब्दातीत असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की माऊलींची सात्विकतेची पराकाष्ठा आणि विनम्रतेची पराकाष्ठा लक्षात घ्यायला हवी. खरे अध्यात्म शब्दातील असते आणि ज्ञानेश्वरीतील करुण रस आणि शांत रस सर्वांनी अभ्यासणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात व घरातील प्रत्येकाच्या हातात गीता हवी असे स्वामीजींनी सांगितले.
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो | भूता परस्परे जडो | मैत्र जिवांचे |
असे ज्ञानेश्वर महाराज पसायदानात म्हणतात असे सांगून स्वामीजी म्हणाले की सज्जनांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करायला हवा आणि असे सज्जन जोडले गेले की, भव्य दिव्य राम मंदिराची उभारणी होते. शकुनीच्या संगतीचा परिणाम गौरव आहेत तर ऋषींच्या संगतीचा परिणाम पांडव असल्याचे त्यांनी सांगितले. सज्जनतेची दिशा दाखविता आली पाहिजे , असे सांगून स्वामीजी म्हणाले की चांगल्या प्रथा निर्माण करायला हव्यात.
भगवंताची भक्ती हाच सर्वोत्कृष्ट अलंकार असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की, सर्वांचा आधार भगवंताची भक्तीच असायला हवी.
- मुलांचे नाव हॉटेलमध्ये ठेवले तर त्यांचा व्यवहार हॉटेल प्रमाणेच होईल.
- संपत्तीच्या चांगला उपयोग विठ्ठल भक्तीच्या वृद्धीकडे व्हावा.
- भगवंतांची भक्ती ही कृपा साध्य बाब आहे.
- ज्ञानेश्वरी कळावी म्हणून ही भावकथा सादर केली.
- सगळे सोडा पण ज्ञानेश्वरी सोडू नका.
स्वामी गोविंददेव गिरी यांना सन्मानपत्र देऊन साई सुपर मार्केट तर्फे गौरविण्यात आले. पंडित लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सुमधुर वाणीत ज्ञानेश्वरी पारायणाचे संचालन केले . ह. भ. प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली