मुंबई : एकीकडे परतीच्या पावसाचे वारे वाहत असताना, दुसरीकडे हवामान विभागाने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नैऋत्य मोसमी परतण्यास सुरु झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. नैऋत्य मान्सून राजस्थानातून माघारी फिरत असल्याची घोषणा यापूर्वीच हवामान विभागाने केली होती. तसंच याआधीही हवामान विभागाने 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. नैऋत्य मान्सून सामान्यपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. साधारणपणे 17 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो.