पट्टाभिषेकाच्या एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाचा शुभारंभ
वाराणसी : भारतीय संस्कृतीमध्ये गुरू शिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. ही परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत राहणार आहे. जगाला अपूर्व ज्ञान देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या श्वासोच्छवासातून चार वेद आणि वैखरीच्या उपदेशातून अठ्ठावीस आगमांची निर्मिती केली. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये वेद आणि आगमच महत्त्वाचे मानले जातात. आपल्या देशामध्ये जेवढी गुरू-शिष्य परंपरा आहे या सर्वांचे आदिगुरू शिवालाच मानले जाते. शिवाच्या पंचमुखातून प्रकट झालेले जगद्गुरू पंचाचार्यांनी या भूलोकात लिंगात अवतार घेऊन सनातन वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्यांनी सर्वांना शिवाचे ज्ञान पोहोचवण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये आपल्या अनेक शाखा मठांची स्थापना केली.
परशिवाचे परमज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. काशीपीठसुद्धा अनादिकालापासून हे परमज्ञान सामान्य लोकांना देत आले आहे. हे कार्य निरंतर सुरू आहे. देवासमोर आपण अखंड ज्योत लावतो तसेच काशीपीठामध्ये ज्ञानाची अखंड ज्योत सनातन काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत चालत राहणार आहे. काशीपीठाची ज्ञानदान परंपरा निरंतर चालावी म्हणून आपल्या उत्तराधिकाराऱ्याचे पट्टाभिषेक करीत आहोत असे विचार काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशिर्वचनात सांगितले. काशीपीठामध्ये नूतन पट्टाभिषेकाच्या निमित्ताने एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाच्या शुभारंभादिवशी दिव्य सान्निध्यस्थानी आशीर्वचन सांगताना हे विचार मांडले.
या उद्घाटन समारंभामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, भारताचे उद्योगपती श्री. बाबासाहेब कल्याणी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव, उद्योगपती धर्मराज खेणी, प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अब्बेतुमकुरचे श्री ष.ब्र.डाॅ. गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी पंचाचार्य ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून केले.
महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात आणि काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. डॉ. गंगाधर शिवाचार्य यांना ‘शिष्यहृत्पद्मभास्कर:’, बाबा कल्याणी यांना ‘उद्यमरत्न’, भगवंत खुबा यांना ‘समाजसेवा भूषण’, शिवराज पाटील यांना ‘समाजसेवा रत्न’, धर्मराज खेणी यांना ‘धर्मभूषण’, डॉ. संगमेश सौंदत्तीमठ यांना ‘साहित्य भूषण’, पंढरपूरचे सुभाष सिद्राम म्हमाणे यांना ‘दान चिंतामणी’, पुण्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ ‘वैद्यरत्न’ , बसवराज पाटील ‘धर्मभूषण’ अशा पदव्या देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना सर्व मान्यवरांनी काशीपीठ आणि जगदगुरू यांच्याविषयी ऋण व्यक्त केले.
सकाळी सात पंचेचाळीसला अखंड दीपप्रज्वलन करून काशी जगद्गुरू आणि उत्तराधिकारी या दोघांनी रुद्राभिषेकाचा प्रारंभ केला. शादनगर गुरुकुलच्या पस्तीस विद्यार्थांनी अतीरुद्राचा शुभारंभ केला. दुपारी सर्वांनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुकुलचे वेद प्रा. मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वेदघोष केला. बार्शी दहिवडकर मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य यांनी मंगलस्तोत्र गायले. या कार्यक्रमाला पुण्याच्या विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल भरतशेठ गाढवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी यांच्यासह सर्व संचालक तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि भारतातील विविध प्रांतातील हजारो भक्तगण, काशीपीठाचे वीरशैव विद्वत् संघाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पुण्याचे पत्रकार श्री विद्याधर ताठे यांनी केले.