नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर एबीपी माझाने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. “बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
“मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार, ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं, मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिलं आहे, माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, दबाव टाकणाऱ्यांना मदत केली नाही तर तुमच्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील, तुम्हाला अटकही करु असं पत्र मी नायडूंना लिहिलं होतं. मला कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत खचले आहेत असं वाटेल, पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही.
आज जे ते काय सांगत आहेत, ते आम्ही कष्टाच्या पैशातून घेतलं आहे. घर असेल, गावची लहानची जमीन असेल, 2009 मध्ये घेतलीय. भाजपचे नाचे जे नाचतायत ना, हा राजकीय दबाव आहे, एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत. भाजप हे भिकारी लोक आहेत. यांच्याकडे काही नाही, यांचे जे देणगीदार आहेत त्यांची चौकशी ईडीने करायला हवी. मात्र आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई होतेय. पण आम्हाला काही फरक पडत नाही, अशा कारवाया करत राहायला हवं, महाराष्ट्रतील जनतेला हे कळायला हवं कशा कारवाया सुरु आहेत.