येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. अशात महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी बोलताना म्हटलं आहे की, जोपर्यंत कोरोना आपल्यातून जात नाही तोपर्यंत मास्क लावायचाच, ज्या दिवशी मास्क काढण्याबाबत ठरेल आम्ही अगदी पत्रकार परिषद घेऊन सांगू. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, ना बोलणं झालंय, असंही ते म्हणाले.
अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक
अजित पवार यावेळी म्हणाले की, फ्लायओव्हरच्या खाली चांगलं काम पालिकेकडून करण्यात आलं आहे. सात रस्तामध्ये देखील चांगली काम आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. माहिमच्या किल्ल्यामधील लोकांना लवकर शिफ्ट करून ती जागा पर्यटकांसाठी खुली करणार आहे. ही काम करत असताना खूप लोकांना शिफ्ट करावं लागलं आहे पण कुणावर अन्याय केला नाही.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. मुंबई आणि मुंबई उपनगराला निधी कमी मिळत आहे. CSR, राज्य शासनाचा, कॉर्पोरेशनचा फंड देऊन मुंबईचा विकास हा जास्त होईल, असं ते म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र काम करत आहेत. युतीबाबत तुम्ही जे विचारत आहेत ते वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील, असं ते म्हणाले.
