नवी दिल्ली : केंद्र सरकारने अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ही बैठक होईल. या बैठकीत तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना माहिती का देत नाहीत, असा सवाल केला होता. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याच आश्वासन भारताने दिले आहे .
अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा केल्यानंतर बाकीचे देश तिथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणत आहेत. शिवाय काही अफगाणी नागरिकांना देखील आश्रय देण्यासाठी देशात आणल जातंय. नुकतच भारतीय वायू दलाने अफगाणिस्तानमधील संघर्षजन्य आणि भीतीदायक परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह एकूण १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ४०० भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत करोना, पोलिओ लस – ओपीव्ही आणि एफआयपीव्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे , अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.