पुणे: करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘करोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यानंतर व्यक्तीच्या शरीरातले अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे.सायरस पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
लसीकरण, लॉकडाऊन व सरकारी धोरण अशा सर्वच मुद्द्यावर सायरस पूनावाला यांनी रोखठोक मते मांडली. ‘कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे नसून तिसरा डोसही गरजेचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बूस्टर डोसनतर पुन्हा लस घ्यायला लागू शकते,’ असं ते म्हणाले. ‘लसीचा दुसरा डोस दोन ते तीन महिन्याच्या आत घेणं योग्य आहे. लस उपलब्ध नसल्यामुळं सरकारनं ८४ दिवसांची अट घातली. कॉकटेलचा लसीचा पर्याय देखील योग्य नाही. त्याचे दुष्परिणाम आल्यास कोणाला जबाबदार धरणार,’ असा सवाल त्यांनी केला. करोनाची तिसरी लाट तीव्र नसेल, असे वाटते . सामुदायिक रोग प्रतिकार शक्ती आणि लसीचं संरक्षण असल्याने लाट आली तरी तिची तीव्रता कमी असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी उपाय असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तसे निर्णयही घेतले जात आहेत. मात्र, लॉकडाउन लावणे योग्य नाही. सरकारने लॉकडाउन लावूच नये,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे. ‘करोना मृत्युदर खूपच कमी आहे. मृत्यू वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी दिला.