१० हजार २० पात्र लाभार्थ्यांची विविध मान्यवरांच्या हस्ते गृहकर्जासाठी घरांची सोडत
सोलापूर (१ ऑगस्ट) – पंतप्रधान आवास योजना अंतर्गत रे नगरच्या कुंभारी माळरानावर नवी मुंबईच्या धर्तीवर रे नगर हे नवे सोलापूर उभारणार. या पथदर्शी व महत्वाकांक्षी गृह निर्माण प्रकल्पाच्या परिपूर्तीसाठी सोलापूरचे खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. हे अभिवचन मी ब्रम्ह वाक्य समजतो कारण, हे प्रकल्प म्हणजे सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी बाब आहे. यासाठी परंतु सोलापूर महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आकसापोटी जी हरकत घेतली हे योग्य नसून तीस हजार कामगारांच्या घरांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचे काम आहे. या हरकती विरुद्ध ९ ऑगस्ट रोजी तीस हजार असंघटित कामगारांना घेऊन महाधरणे करणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान आवास योजना अभियाना अंतर्गत जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांचे पथदर्शी, महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर कॉ.ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशन मौजे कुंभारी ता.द.सोलापूर च्यावतीने ९ ऑगस्ट २०२२ रोजी हस्तांतरित करण्यात येणाऱ्या पंतप्रधान अभियाना अंतर्गत अंतिम मंजुरी मिळालेल्या घरकुलांचे पहिल्या टप्प्यातील १० हजार २० पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून गृहकर्जासाठी घरांची सोडत (लॉटरी) लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज रविवारी रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली प्रातिनिधिक स्वरूपात सोडत सोहळा पार पडला.
पुढे आडम म्हणाले की, मूलभूत सुविधा, अंतर्गत रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज, पावसाळी गटार, शाळा, महाविद्यालय, दवाखाना अन्य अत्यावश्यक सेवांसाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रकल्पास सहकार्य करावे. तसेच २ ऑगस्टपासून गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या तपशीलाप्रमाणे कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन केले.
तदनंतर खासदार, महापौर, उपजिल्हाधिकारी, नगरसेविका व विविध गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. याचे तांत्रीक काम पुणे विभाग म्हाडाचे मिळकत व्यस्थापक विजय ठाकूर यांनी काम पाहिले.
यावेळी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, गजानन गुरव, विजय ठाकूर, आण्णाराव बाराचारे, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, नगरसेविका कामिनी आडम, रे नगरचे सचिव युसूफ शेख, ऍड.एम.एच.शेख, महादेव कोगनूर, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, कुरमय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, गजेंद्र दंडी, यशोदा दंडी, विजयलक्ष्मी महेशन,वीरेंद्र पद्मा, लता सारंगी,लक्ष्मण माळी, शंकर गड्डम, संदीप रेऊरे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले. प्रास्तविक युसूफ मेजर शेख यांनी केले. नलिनी कलबुर्गी यांनी प्रकल्पाची माहिती दिले. स्व. गणपतराव देशमुख यांचा शोकप्रस्ताव कामीनी आडम यांनी मांडले.