कोल्हापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा दिला आहे.
कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यामधल्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी नदीपात्रातील अतिक्रमण हे देखील महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणे शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामे करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचे , ते होऊ द्या. पण असे आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणे हा महत्त्वाचा भाग आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.लोकांच्या अपेक्षा आहेत की हे दरवर्षी व्हायला लागले आहे. आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल, तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावे लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचे पुनर्वसन करणे ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे , असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले . मी येऊन या पुराचे भीषण वास्तव बघितले आहे. या कामाला गती दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.