सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा भक्तिमार्ग असणारा सोलापूर तिऱ्हे मार्गे कुरूल ते पंढरपूर या राज्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पूर्णतः खचून गेला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्डयात पाण्याची डबकी तयार झाली असून या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनाचा व माणसांच्या शरीराचा खिळखिळा होत आहे.या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरनाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या फेऱ्यात अडकला आहे.रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीची हेव्ही व्हेईकल्स गेल्याने हा रस्ता पुर्णतः खराब झाला आहे.
त्यामुळं संतप्त नागरिक या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार? असा प्रश्न विचारत आंदोलनाचा पावित्रा स्वीकारला आहे.त्यात लक्ष्यवेधी आंदोलन करण्याचा उद्देशाने भर रस्त्यातल्या खड्यात रक्तदान, जागरण गोंधळ अशी आंदोलने सुरु केली आहेत.
दरम्यान सध्या पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवावेत आणि नवीन रस्त्याचे कामही त्वरित मार्गी लावावे या मागणीसाठी दि.२७ जुलै रोजी सोलापूर तिर्हे मार्गे पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रशासन आणि सरकारला जाग यावी म्हणून वाघ्या – मुरळीचा जागरण गोंंधळ कार्यक्रम घेण्यात आला.महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.