नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातून ‘पेगॅसस’ संदर्भातील निवेदनाचे कागद हिसकावून घेणारे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार शांतनू सेन यांना पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सेन यांच्यावर कारवाई केली.
निलंबन झाल्यामुळे सभागृहातून निघून जाण्याची विनंती नायडू यांनी सेन यांना केली, पण तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या समोर येत घोषणाबाजी केली. नायडू यांनी साडेबारा वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच, आपण तात्काळ सभागृहातून बाहेर जावे, असे उपसभापती हरिवंश यांनी सेन यांना बजावले. सभागृहातील गोंधळ सुरू राहिल्याने कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब झाले. दुपारच्या सत्रातही गदारोळ न थांबल्याने राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.