टोकियो : भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८४ किलो आणि दुसर्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात ती ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. ९४ किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी ११७ किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी झाली.माननीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणार्या मीराबाई चानूचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.मीराबाई २०१७मध्ये वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपची (४८ किलो) विजेती ठरली. यावर्षी एप्रिलमध्ये तिने ८६ किलो स्नॅच आणि विश्वविक्रमी ११९ किलो वजन उचलून विजेतेपद जिंकले. तिने एकूण २०५ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले. २०१६ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धा चानूसाठी निराशाजनक होती. पण त्यानंतर तिने सतत आपला खेळ सुधारला. २०१७मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१८मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १२७ खेळाडूंसह भारताने यावेळी आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवले आहे. उद्घाटन सोहळ्यात एकूण २० खेळाडूंसह ६ भारतीय अधिकारी सहभागी झाले होते.