येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या राज्यासह सोलापूरमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जात आहे. मात्र सोलापूरबाबत लसीकरणात दुजाभाव होत आहे. उजनीच्या पाण्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या लसी पुणे जिल्ह्यात पळविण्यात येत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तरी पुणे विभागातील इतर जिल्ह्याप्रमाणे सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी लोकसंख्यच्या तुलनेत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलवर पाठवलेल्या निवेदनात आ. देशमुख यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या तुलनेत कमी लस पुरवठा केला जात आहे. पुणे विभागात कोरोना संसर्ग व लोकसंख्येच्या बाबतीत सोलापूर जिल्हा दुसर्या कमांकावर आहे. पण लस उपलब्ध होण्याबाबत शेवटच्या कमांकावर आहे. उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांना सोलापूर जिल्ह्यापेक्षा जास्त लसी मिळाल्या असून सोलापूरबाबत जाणीवपूर्वक दुजाभाव होत आहे. सोलापूर जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. लस उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना केंद्रांवरून घरी जावे लागत आहे. कारोना महामारीच्या तणावात सोलापूरकरांचे आतोनात हाल होत आहेत .तरी पुणे विभागातील इतर जिल्हयाप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरिता लोकसंख्यच्या तुलनेत कोरोना लस उपलब्ध करून देण्यात यावी, कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये. हा लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. तरी लवकरात लवकर लस उपलब्ध न केल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही आ. देशमुख यांनी म्हटले आहे.